१२ जानेवारी हा थोर विचारवंत, तत्त्ववेत्ते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा केला जातो. सशक्त, सश्रद्ध आणि सतेज युवक ही राष्ट्राची खरी शक्ती आहे, हे ओळखून विवेकानंदांनी युवकांना संदेश दिला आणि त्यांना प्रेरणा देईल, असे कार्य केले. त्यांनी युवकांना दिलेले काही निवडक विचार येथे देत आहोत..........
कठोपनिषदातील ज्या एका उदात्त, ओजस्वी शब्दाचे मला सदा स्मरण होते, तो म्हणजे ‘श्रद्धा’ - ज्वलंत श्रद्धा हा होय. या खऱ्याखुऱ्या श्रद्धेचा प्रचार करणे, हेच माझे जीवितकार्य होय. ही श्रद्धा म्हणजे समग्र मानवतेचे, समस्त धर्मांचे एक अत्यंत सामर्थ्यशाली अंग आहे, हे मी आपणास फिरून सांगतो. धीर-स्थिर चित्ताने, खंबीरपणाने कार्य करीत राहा; आणि सर्वांत मुख्य गोष्ट ही की, तुम्ही पवित्र बना, पूर्णपणे निष्कपट बना. आपल्या उज्ज्वल भवितव्यावर दृढ श्रद्धा असू द्या.
...
श्रद्धा! श्रद्धा! श्रद्धा! स्वतःवरील श्रद्धा! ईश्वरावरील श्रद्धा! - हेच महान बनण्याचे रहस्य आहे. तुमच्या पुराणांमधून वर्णिलेल्या तेहतीस कोटी देवांवर तुमची श्रद्धा असेल, तसेच परकीयांनी तुमच्यात वेळोवेळी प्रसृत केलेल्या सर्व देवतांवरही तुमची श्रद्धा असेल; पण तुमची स्वत:वर जर श्रद्धा नसेल तर तुम्हाला मुक्ती लाभणे शक्य नाही.
...
जगाचा इतिहास हा स्वत:वर श्रद्धा असलेल्या काही थोड्या माणसांनी घडविलेला आहे. अशी श्रद्धाच आतील देवत्वाला बाहेर प्रकट करते. मग तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्यामधील अनंत शक्ती प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते. कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र जेव्हा श्रद्धाहीन बनते तेव्हा मृत्यू ओढवतो.
....
आपल्याला जर काही हवे असेल, तर ते म्हणजे ही श्रद्धाच होय. दुर्दैवाने आज ती भारतातून प्राय: लोप पावली आहे, आणि म्हणूनच आपली अशी दुर्दशा झाली आहे. मनुष्यामनुष्यांत काही फरक दिसत असेल, तर तो या श्रद्धेमुळेच होय, दुसऱ्या कशामुळे नाही. एक जण थोर, तर दुसरा सामान्य व दुर्बल, असे कशामुळे होत असेल, तर ते श्रद्धेमुळेच होय.
...
ज्याचा स्वत:वर विश्वास नाही तो नास्तिक. जुना धर्म म्हणत असे, की ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. नवा धर्म म्हणतो, की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तोच नास्तिक.
...
मनुष्य स्वतःला दुःखी, हीन व कुचकामी समजत असेल तर तो कुचकामीच होऊन जाईल. ‘मी आहे, माझ्या ठायी शक्ती आहे’ असे तुम्ही म्हणाल, तर तुमच्या ठायी शक्ती प्रकट होईल आणि ‘मी नाही, मी कुणीच नाही’ असा मंत्र तुम्ही जपत राहाल आणि अहोरात्र ‘मी क्षुद्र व दुर्बल आहे’ असे चिंतन करीत राहाल, तर तुम्ही कुचकामीच होऊन जाल. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण सर्वशक्तिमान ईश्वराची लेकरे आहोत, आपण अनंत व दिव्य अशा अग्नीचे स्फुल्लिंग आहोत, आपण दीनहीन कसे होऊ शकू? आपल्या ठायी सर्व शक्ती आहे, आपण सर्व काही करण्यास सिद्ध आहोत, आपण सर्व काही करू शकतो आणि आपण सर्व काही केले पाहिजे.
...
लोकांना स्वत:च्या पायांवर उभे राहायला शिकविले, नाही तर भारतातील एखाद्या लहानशा खेड्याच्या मदतीसाठी सगळ्या जगाची धनदौलतसुद्धा अपुरी पडेल. आपल्या कार्याचे स्वरूप मुख्यतः शैक्षणिक असावे. नैतिक आणि बौद्धिक असे दोन्ही प्रकारचे शिक्षण आपण द्यावे.
...
विश्वास असू द्या, की तुम्ही सर्व जण महान कार्ये करण्यासाठी जन्माला आला आहात. कुत्र्यांच्या भुंकण्याने भयभीत होऊ नका - एवढेच नव्हे, तर आकाशातून वज्रपात झाला, तरी भिऊ नका. उठा, उठा, कामाला लागा.